मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार! नगर परिषदेच्या पावती पुस्तकावर अद्यापही वसुली; आर्थिक घोटाळ्याची शक्यता; विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली? बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी!
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी - येथील नगर परिषदेचे रुपांतर जालना शहर महानगर पालिकेत होऊन दोन वर्षे उलटली आहेत. असे असले तरी अद्यापही जुन्याच म्हणजे नगर परिषदेच्या पावती पुस्तकांवरून फळ-भाजी विक्रेत्यांकडून पैसे वसुली होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे मनपात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. मनपाच्याच कर्मचार्यांकडून हा प्रकार होत असल्याने मनपाच्या भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली?
महानगर पालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी सोमवार, बुधवार, रविवार, शुक्रवार आदी दिवशी बाजार भरविल्या जातात या बाजाराचा ठेका दरवर्षी मनपा प्रशासनाकडून दिल्या जातो. या आर्थिक वर्षात मात्र, मनपा प्रशासनाने कुणाला कोणते ठेके दिले हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही. याबाबत विचारणा केली असता मनपा प्रशासनाकडून अद्याप ठेका दिला नसल्याचे तोंडी सांगण्यात येते. असे असले तरी विविध बाजारात मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. शुक्रवार (दि.9) रोजी रामनगर आझाद मैदान परिसरात भरत असलेल्या बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी बाजारातील शेतकरी - व्ययसायिकांना दिल्याची घटना घडली आहे. आता या बाजाराचा नेमका ठेका कुणाला दिला? आणि दिला असेल असेल तर त्या नियमात धमकावून वसुली करण्याचे निर्देश आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मुळात बाजार ठेक्यांऐवजी मनपा प्रशासनाने स्वतः वसुली केल्यास त्यांच्या उत्पन्नात भर पडण्याची खात्री आहे. असे असले तरी बाजार ठेके देऊन मस्सल पॉवर वापरून वसुली करण्याचे परवाने मनपा प्रशासन का देत आहे?

या प्रकरणाची सखोल चौकशी करून गजानन सोनवणे व अतिरिक्त आयुक्त यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

About The Publisher
