परदेशी विद्यापीठाच्या आगमनाने भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र होण्याच्या मार्गावर
मुंबई - सरकार, उद्योग, परदेशी विद्यापीठे आणि स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने भारत जगातील आघाडीचे शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर सांस्कृतिक, आर्थिक आणि सामर्थ्यवान भारताच्या उभारणीचे पर्व ठरणार आहे.भारत उच्च शिक्षणाच्या जागतिक नकाशावर एक नवा अध्याय लिहित आहे, असे मत ऑस्ट्रेलिया व ब्रिटनच्या उच्चायुक्तातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
“मुंबई रायझिंग : क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान कार्यक्रम आज मुंबईतील हॉटेल ताज येथे झाला. यावेळी भारतातील परदेशी विद्यापीठे: उद्योग आणि शैक्षणिक सहकार्यासाठी एक नवीन सीमा (Foreign Universities in India: A New Frontier for Industry and Academic Collaboration) या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिटिश कौन्सिलच्या भारतातील संचालक अॅलिसन बारेट आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयातील शिक्षण सल्लागार जॉर्ज थिव्हिओस यांनी भारतातील परदेशी विद्यापीठांची वाढते स्थान, दोन्ही देशांतील सहकार्याचे स्वरूप आणि भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर नेतृत्व मिळवण्यासाठीची गरज यावर मत मांडले.
मुंबई हे शैक्षणिक आणि सर्जनशील केंद्र – बारेट
यावेळी श्रीमती अॅलिसन बारेट म्हणाल्या, की. मुंबई ही केवळ आर्थिक नव्हे तर सर्जनशील उद्योगांची राजधानी आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक सहकार्याला विशेष महत्त्व आहे. युके सरकारच्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक धोरणात सर्जनशील क्षेत्राला अग्रक्रम आहे आणि भारतासोबत सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या इम्पीरिअल कॉलेजने नुकतीच बेंगळुरूमध्ये आपली शाखा उघडली आहे. पूर्वी शिक्षणासाठी देशाबाहेर गेलेले विद्यार्थी भारतात परत येत नसत. पण आता ही परिस्थिती बदलते आहे. ‘ब्रेन ड्रेन’ ऐवजी आता ‘ब्रेन सर्क्युलेशन’ घडत आहे,” असे अॅलिसन बारेट यांनी स्पष्ट केले.
भारतीय पारंपरिक ज्ञान, स्टार्टअप संस्कृती आणि नवाचाराला परदेशी विद्यापीठे देखील आत्मसात करू लागली आहेत. युकेच्या अंदाजे ३०० आंतरराष्ट्रीय केंद्रांचा दाखला देत भारतातही अशा सहकार्याच्या अमर्याद शक्यता असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
ऑस्ट्रेलिया-भारत: दीर्घकालीन शैक्षणिक भागीदारी – जॉर्ज थिव्हिओस
जॉर्ज थिव्हिओस म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शैक्षणिक संबंध नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने अधिक दृढ झाले आहेत. आयआयटी मुंबई,–मोनाश, टीआयएसएस–मोनाश, पुणे विद्यापीठ–युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न यांसारख्या सहकार्यामुळे भारतात शैक्षणिक पायाभूत सुविधा तयार आहेत.
भारतात एकाच शहरात पाच विविध देशांतील विद्यापीठे उघडणे ही जागतिकदृष्ट्या दुर्मिळ गोष्ट आहे. ही सहकार्याची नवी सुरुवात आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार, एका विद्यापीठात १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली, तर त्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनावर एक अब्ज डॉलर्सचा परिणाम होतो. भारतात सध्या पाच परदेशी विद्यापीठे सुरू होत असून, याचा ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक फायदा अपेक्षित आहे, असे जॉर्ज थिव्हिओस यांनी सांगितले.
या विशेष परिसंवादाचे सूत्रसंचालन शूलीनी विद्यापीठाचे संस्थापक व उपकुलपती अतुल खोसला यांनी केले.

About The Publisher
