लखनऊत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हजारो पदाधिकार्यांनी घेतला दंगामुक्त उत्तर प्रदेशाचा संकल्प
लखनऊ । प्रतिनिधी - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे सरदार सेनेतर्फे आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो पदाधिकार्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने लोहिया सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शेख सुभान अली यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज कुणबी म्हणजेच कुर्मी समाजाचे होते, तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जाधव कुटुंबातील होत्या, ज्यांचा संबंध देवगिरीच्या यादव राजवंशाशी आहे. या ऐतिहासिक सत्याने यादव आणि कुर्मी समाज बांधव असल्याचे अधोरेखित झाले. ही माहिती ऐकून अखिलेश यादव यांच्यासह उपस्थित सर्वजण प्रभावित झाले.
या घोषणेने उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि सामाजिक एकतेचा संदेश दृढ झाला.
हा कार्यक्रम प्रारंभी भव्य मैदानावर होणार होता, परंतु उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने ऐनवेळी परवानगी रद्द केल्याने तो लोहिया सभागृहात आयोजित करण्यात आला. तरीही हजारो सरदार सेना पदाधिकार्यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या विचारांप्रती अटळ निष्ठा आणि उत्साह दाखवला.
किसान सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार आणि दंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे संयोजक शेख सुभान अली यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली.
सरदार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर.एस. पटेल यांनी शेख सुभान अली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वात दंगामुक्त उत्तर प्रदेश अभियान राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यांनी भाजपा सरकारच्या काळात कुर्मी समाजावर झालेल्या 11 हजार बनावट चकमकींचा धक्कादायक खुलासा करत, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याची गर्जना केली.
डॉ. पटेल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आमच्या रक्तात अन्याय सहन करण्याची वृत्ती नाही.
शेख सुभान अली यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार सेना उत्तर प्रदेशात दंगामुक्त, मानवतावादी समाज घडवण्यासाठी पेटून उठेल.
अविनाशजी काकडे यांनी बहुजन समाजाला महापुरुषांच्या जयंत्या साजर्या करण्यापलीकडे त्यांच्या विचारांनुसार शांतताप्रिय, न्यायप्रिय समाज निर्माण करण्याचे आवाहन केले.
कामाजी पवार यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवरायांच्या विचारांनी देशाला जोडण्याची भूमिका मांडली.
शेख सुभान अली यांनी शिवाजी महाराजांचे शेतकरी, शोषित, पिडीत आणि महिला रक्षक तसेच लोककल्याणकारी चरित्र सविस्तर सांगत, दंगामुक्त उत्तर प्रदेशासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. ते म्हणाले, महाराष्ट्रात दंगामुक्त अभियान यशस्वी झाले आहे. आता दंगामुक्त भारत आणि लवकरच काश्मीरात शांती प्रस्थापित करू.
कुर्मी समाजाची निर्णायक ताकद
उत्तर प्रदेशातील 140 विधानसभा मतदारसंघांत कुर्मी (कुणबी) समाजाचे मतदार निर्णायक भूमिका बजावतात. या समाजावर होणार्या अत्याचारांवर सरदार सेनेने चिंता व्यक्त करत, शिवराय आणि जिजाऊंच्या विचारांनी सर्व समाजांना एकत्र जोडण्याचा संदेश दिला.
हे राज्य अवघ्यांचे, सर्व जाती-पातीने ते रक्षावे, या शिवरायांच्या संदेशाला उजाळा देत, शेख सुभान अली यांनी दंगामुक्त भारत मिशनच्या यशाचे श्रेय शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या त्याग आणि समर्पणाला दिले.
उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांतून आलेल्या हजारो सरदार सेना पदाधिकार्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.
दंगामुक्त भारताकडे दमदार वाटचाल
हा सोहळा केवळ शिवराज्याभिषेकाचा उत्सव नसून, शिवराय आणि जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक एकता, शांतता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. यादव आणि कुर्मी समाजाच्या बंधुत्वाचा संदेश देत, जय जिजाऊ, जय शिवराय च्या घोषणांनी सभागृह दणाणले.
शेख सुभान अली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. आर.एस. पटेल यांच्या नेतृत्वात दंगामुक्त उत्तर प्रदेश अभियान नव्या जोमाने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला.

About The Publisher
