पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’ ‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम
छत्रपती संभाजीनगर -पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हा ही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. ह्या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करुन फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे.


संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आल्यामुळे गावातील वीज चोरी पूर्ण बंद झाली. सर्व जोडण्या वैध झाल्या. शिवाय प्रत्येक सौर पॅनेल सोबत घरावर वीज अटकाव यंत्रे, अर्थिंगही लावण्यात आली. त्यामुळे सुरक्षितता आपोआप वाढली.
संपूर्ण सौरग्राम झालेले पोफळा हे गाव संपूर्ण मराठवाडा विभागातील पहिलेच गाव ठरले आहे,असा दुजोरा महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला आहे. आता हीच कंपनी येत्या वर्षात म्हणजेच सन २०२५-२६ मध्ये मुंबापूरवाडी ता. खुलताबाद ह्या गावाला संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्यासाठी काम करीत आहे.
अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक करुन किमान कार्बन उत्सर्जन करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे १२ हजार ७२५ कृषीपंपांना दिवसा वीज
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १२ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती महावितरण कडून प्राप्त झाली आहे.
‘महावितरण’ ने दिलेल्या आकडेवारीनुसार, वैजापूर तालुक्यातील लोणी येथील १० मेगावॅटच्या प्रकल्पातून लोणी, वाकला, चिकटगाव, नायगव्हाण, खरज, तलवाडा व बाभूळल गावातील १६६५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथे ५ मेगावॅट प्रकल्पातून गेवराई गुंगी, रिधोरा देवी, कोलते टाकळी, धानोरा व निमखेडा गावातील ८५४ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील अन्वी उपकेंद्रांतर्गत रहिमाबाद येथील ५ मेगावॅट प्रकल्पातून रहिमाबाद व आसडीतील ९०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव उपकेंद्रांर्तत जोडवाडीतील ४ मेगावॅटच्या प्रकल्पातून १ हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत आहे. वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून भायगाव गंगा, उंदीरवाडी, राजुरा, पाशापूर, राहेगाव, सोनवाडीच्या ५३७ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून मंगरूळ, चांदापूर व पालोदच्या ८५० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.धोंदलगाव (ता.वैजापूर) प्रकल्पातून धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. वरखेडी (ता. फुलंब्री) प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील ५ मेगावॅट प्रकल्पातूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. जिल्ह्यात एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प येत्या मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी व्यक्त केला आहे.

About The Publisher
