जालना | प्रतिनिधी - काही दिवसापासून जालना शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीने जालना शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसह अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचेही पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य खराब झाल्याने मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
आधार ग्रुपचे अध्यक्ष अश्विन अंबेकर यांनी ही बाब लक्षात घेत आज शुक्रवार रोजी आधार ग्रुपचे सदस्य कुणाल देशमुख, अभिमन्यू काठोठीवाले, संदीप मगर, आकाश बारगजे, चेतन गुप्ता, गौरव इंगळे, गणेश डोके यांना सोबत घेऊन जालना शहरातील साठे नगर व परिसरातील गोरगरीबांच्या या वस्तीत वह्या व पेन या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आधार ग्रुप हा नेहमीच वेगवेगळ्या अडचणीच्या प्रसंगी सामान्य व अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करत असतो. यापूर्वीही आधार ग्रुपच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अन्नधान्याच्या किट वाटून आपत्तीग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. आधार ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.