श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण

श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण

आता श्रेयाच्या भाजपाकडून आणि शासकिय जाहिराती निघतील... त्यातही अतिरेक केवळ धनदांडग्या मीडियाची सोय करण्यासाठी व देवाभाऊ मराठ्यांचे कैवारी आहेत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. म्हणजे हे असं झालं स्वातंत्र्य भारतासाठी बलिदान देणारे, लढणारे यांना नव्हे स्वातंत्र्याचे श्रेय इंग्रजांना देणे...

मराठा आरक्षणाच्या दीर्घकालीन आंदोलनानंतर अखेर शासनाने काही निर्णय जाहीर केले. या निर्णयानंतर गावोगावी, सोशल मीडियावर विविध जाहिराती, बॅनर आणि पोस्टरचा पाऊस पडताना दिसत आहे. आश्चर्य म्हणजे या आंदोलनातून उभा राहिलेला संघर्ष, बलिदान, त्याग आणि सातत्यपूर्ण लढा मराठा समाजाचा असताना, श्रेय मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे.

हे जरा असेच झाले की — स्वातंत्र्य लढ्यात हजारो क्रांतिकारकांनी तुरुंगवास, फाशी आणि अत्याचार सहन करून अखेर स्वातंत्र्य मिळवून दिले आणि मग श्रेय देण्यात आले इंग्रजांना!

मराठा समाजासाठी आरक्षण हा एकाच दिवसात मिळालेला निर्णय नव्हता. मागील दशकभर आंदोलने, मोर्चे, उपोषणे, आत्मत्याग या सर्वातून हा प्रश्न तीव्र झाला. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलनाने समाजाच्या भावना ढवळून काढल्या. शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला, कारण रस्त्यावरची ठिणगी आगीमध्ये रूपांतरित होऊ लागली होती.

भारतात राजकारण म्हणजे केवळ निर्णय नव्हे, तर त्याभोवती उभे केलेले श्रेयाचे जाळे. शासनाकडून कोणताही निर्णय घेतला की लगेचच पोस्टरबाजी सुरू होते. कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आपल्या नेत्याचे कौतुक करणाऱ्या पोस्टरनी गावोगाव, शहरशहर सजवतात. मराठा आरक्षणाचा निर्णय आला आणि लगेच सोशल मीडियावर बॅनर – “धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद फडणवीस साहेब”, “मराठा समाजाचे तारणहार” अशा घोषवाक्यांनी पाटे भरले.

Read More राजेहो तुमच्या पाठिंब्याने जिंकलो - मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय जारी... जशाचा तसा शासन निर्णय येथे वाचा...

प्रश्न असा आहे की या आंदोलनात समाजाने जे सहन केले त्याचे काय? आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो युवकांवर गुन्हे दाखल झाले, कुटुंबांनी उपोषणकर्त्यांचे हाल पाहिले, काहींनी आपले प्राण गमावले. खरा लढा समाजाने दिला. शासनाने केवळ परिस्थिती चिघळली तेव्हा ‘उपाय’ जाहीर केला. मग श्रेयाचे राजकारण हे न्याय्य कसे?

श्रेयाचे राजकारण हे दोन कारणांनी फोफावते एक म्हणजे राजकीय ब्रँडिंग: प्रत्येक नेत्याला आपली प्रतिमा ‘निर्णायक, समाजहितैषी’ म्हणून उभी करायची असते. आणि दुसरे समर्थकांचा अंधानुकरण: कार्यकर्ते आणि समर्थक ‘नेता म्हणजे देव’ या भावनेतून कृतज्ञतेचे अतिरेक करतात.

आज मराठा समाजाने लक्षात ठेवले पाहिजे की, आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे, कुणी नेत्याने दिलेली ‘कृपा’ नाही. हे यश समाजाच्या एकतेचे आहे, नेतृत्वाच्या प्रामाणिक लढ्याचे आहे. श्रेय जर द्यायचेच असेल, तर त्या आईबापांना द्या ज्यांनी आपल्या लेकराला आंदोलनासाठी पाठवले; त्या तरुणांना द्या ज्यांनी उपोषण करून शासनाला हलवले; त्या कुटुंबांना द्या ज्यांनी आपला संसार संकटात टाकला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नात समाजाचे बलिदान हे इतिहासात कोरलेले आहे. पण आजच्या श्रेयाच्या राजकारणात ते झाकले जात आहे. हे समीकरण लक्षात न घेतल्यास, उद्या समाजाचे आंदोलन आणि त्यातील संघर्ष फक्त एका नेत्याच्या नावावर लिहिला जाईल. इतिहासाचा सत्य विकृत होईल.

स्वातंत्र्य संग्राम जसा क्रांतिकारकांच्या रक्ताने साकारला, तसा मराठा समाजाचा संघर्ष त्यांच्या एकतेने व त्यागाने जिंकला. मग श्रेय इंग्रजांना दिल्यासारखे आज फक्त राजकारण्यांना द्यायचे का, हा विचार समाजाने नक्कीच केला पाहिजे.

LatestNews

श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण
राजेहो तुमच्या पाठिंब्याने जिंकलो - मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय जारी... जशाचा तसा शासन निर्णय येथे वाचा...
जालना येथील कालिंका स्टील गणेश मंडळात श्री गणेश मूर्तीची स्थापना
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा ; असलम कुरैशी यांच्या शिष्टमंडळाने घेतली मराठा योद्धा जरांगे पाटील यांची भेट 
महाबोधी बुध्दविहार मुक्ती साठी निघालेल्या पंचशिल धम्म ध्वज यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत; मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान काढली पद यात्रा
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार
कलकत्ता येथील परिषदेत जालना येथील 'कालिका स्टील्स' चे संचालक गोविंद गोयल यांना 'वक्ता' म्हणून सन्मान