शेतकर्यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असून, तत्पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा उद्या शुक्रवारी (ता. 27) फक्त एकच दिवस उरला असून, खोतकर साहेब... आपण दिलेल्या आश्वासनानुसार चुकांची दुरुस्ती आणि रास्त मुल्यांकनाबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावून काय तो सोक्ष-मोक्ष लावा. त्यातल्या त्यात सर्वात जास्त घाण व अक्षम्य चुका करुन ठेवणार्या भूमिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्यांची मनमानी सुरुच असल्याने त्यांना समक्ष बोलावून घेत त्यांची कानउघाडणी करीत बाधीत शेतकर्यांच्या क्षेत्रातील तफावत दुर करायला भाग पाडा, अशी मागणी श्री. राठी यांनी यावेळी केली.
जालना । प्रतिनिधी - समृद्धी बाधित शेतकर्यांच्या आंदोलनाला आज छप्पन्न दिवस उलटले असले तरी न्याय देण्याच्या बाबतीत शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे. विधीमंडळाचे अधिवेशन तोंडावर असताना संबंधित अधिकारी चालढकल करीत असल्याने आता आमचा संयम संपला असून, आम्ही दिवसभर पावसात बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणाचे बरेवाईट झाल्यास शासन-प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा आंदोलनाचे प्रमुख दिलीप राठी यांनी आज गुरुवारी (ता. 26) आंदोलनस्थळी बोलताना दिला.
विकासकामे करताना नितीबरोबरच नियतही शुध्द असावी-कोल्हे महाराज
समृद्धी महामार्ग बाधित शेतकर्यांच्या आंदोलनाचा आज 56 वा दिवस असून, ऊन, वारा, पाऊस असो की इतर अडचणी असो सर्व शेतकरी व्यक्तिगत काम धंदे बाजुला ठेवून आंदोलनस्थळी येतात. आपल्याला आशेचा किरण पहायला मिळेल, अशी भाबडी आशा अंतःकरणात ठेवून दररोज वाट पाहतात की शासन-प्रशासनातले कुणीतरी येईल आणि आम्हाला न्याय देईल. मात्र, दररोज अपेक्षाभंग होण्यापलीकडे काहीच पदरात पडत नाही, अशी खंत रामनगर (साखर कारखाना) येथील बाधीत शेतकरी हभप गणेश महाराज कोल्हे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, 2 महिन्यापुर्वी आमच्या काही माऊल्या केदारनाथाच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्यातल्या एका माऊलीची मुलगी सन 2013 साली केदारनाथ येथील पुरात वाहून गेली असल्याने ती माऊली यावेळी तिथे गेल्यानंतर आपली मुलगी दर्या-खोर्यामध्ये मिळून येईल, अशी तिला अपेक्षा होती. मुलगी हाक मारत असल्याचा भास तिला झाला. जसे एका आईला आपल्या पुरात वाहून गेलेल्या मुलीने हाक मारल्यास जी वेदना होते ती आई-बापाचं अंतःकरण असलेल्यालाच कळते. बाकी कोणाला या वेदना कळतील की नाही हे सांगता येत नाही. त्या आईला जसा मुलगी हाक मारीत असल्याचा भास झाला तसाच शुद्ध भाव बाधीत शेतकर्यांच्या बाबतीत मायबाप सरकारच्या अंतःकरणात असावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन कोल्हे महाराज पुढे म्हणाले की, सर्व बाधित शेतकरी कुठल्याही संकटाची तमा न बाळगता दररोज येथे येत असून, शासन-प्रशासनाकडून काहीतरी उत्तर मिळेल, असे वाटत असताना दुर्दैवाने तसे घडत नाही. अवस्थेला अनुसरुन व्यवस्था असली पाहिजे, असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. गीता, पखवाज, टाळ, वीणा, श्रोते, मंडप, लाईट, डेकोरेशन या सुविधा आमच्या कीर्तनासाठी लागतात. मात्र, किर्तन कशासाठी आहे याचे उत्तर शोधल्यास अवस्था प्राप्त होण्यासाठी असल्याचे स्पष्ट होते. तथापि, ज्या व्यवस्थेतून अवस्था प्राप्त होत नाही त्या व्यवस्थेलाच किंमत राहत नाही. ज्याप्रमाणे एखादा प्रकल्प राबविण्याची तुमची नीती असेल त्याचप्रमाणे नियतही असावी लागते. वेगवेगळे उद्योग आणायचे, वेगवेगळ्या पध्दतीचे रोड मॅप आणायचे असतील, काय करायचा तो विकास करा; पण आमच्या वडिलोपार्जित जमिनी घेताना तुमची नीती आणि नियत चांगली असली पाहिजे. मात्र, आम्हाला भिकारी करायची एकही संधी तुम्ही सोडत नाहीत. मी व्यक्तिशः वेळोवेळी बाधित झालेलो आहे. काही दिवसापुर्वी माझ्या शेतातून नंबर बांध रस्ता नेताना मोसंबीची 20 झाडे काढून फेकण्यात आली असून, माझी 8-10 फुट जमिन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे माझे प्रचंड नुकसान झाले असताना मावेजाच काय मला साधी विचारणा करण्यात आली नाही, याचे उत्तर कोण देणार. तत्पुर्वी विज वितरणाचे टावर टाकताना हुकूमशाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात कुठलाही मावेजा न देता टॉवर उभारण्यात आले. सन 1985 साली तुमच्या मुलाला नोकरीला लावू असे सांगून आमच्या आजोबांची दिशाभूल केली आणि आमच्या जमिनीतून पिरकल्याण प्रकल्पाचा कॅनॉल नेला. त्यात दीड एकर जमिन गेली असून, नोकरी तर दिलीच नाही. फक्त एकरी दीड हजार रुपये मावेजा दिला. त्यामुळे आमचा बाप नोकरीविना घरी राहिला आणि जमिनही गेली. अशा पध्दतीने वेळोवेळी माझ्यासारख्या अनेक शेतकर्यांवर अन्याय होत असून, ही चौथी वेळ आहे. प्रत्येक शेतकर्याचे हेच प्रश्न असून, यावेळी न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा कोल्हे महाराजांनी शेवटी दिला.


About The Publisher
