शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी

शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असून, तत्पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा उद्या शुक्रवारी (ता. 27) फक्त एकच दिवस उरला असून, खोतकर साहेब... आपण दिलेल्या आश्वासनानुसार चुकांची दुरुस्ती आणि रास्त मुल्यांकनाबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून काय तो सोक्ष-मोक्ष लावा. त्यातल्या त्यात सर्वात जास्त घाण व अक्षम्य चुका करुन ठेवणार्‍या भूमिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांची मनमानी सुरुच असल्याने त्यांना समक्ष बोलावून घेत त्यांची कानउघाडणी करीत बाधीत शेतकर्‍यांच्या क्षेत्रातील तफावत दुर करायला भाग पाडा, अशी मागणी श्री. राठी यांनी यावेळी केली.

जालना । प्रतिनिधी - समृद्धी बाधित शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आज छप्पन्न दिवस उलटले असले तरी न्याय देण्याच्या बाबतीत शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे. विधीमंडळाचे अधिवेशन तोंडावर असताना संबंधित अधिकारी चालढकल करीत असल्याने आता आमचा संयम संपला असून, आम्ही दिवसभर पावसात बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणाचे बरेवाईट झाल्यास शासन-प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा आंदोलनाचे प्रमुख दिलीप राठी यांनी आज गुरुवारी (ता. 26) आंदोलनस्थळी बोलताना दिला.

नांदेड-जालना समृध्दी बाधीत जमिनींच्या रास्त मुल्यांकनासाठी सुरु असलेल्या धरणे आंदोलनाला 56 दिवस उलटले तरी प्रशासन कासवगतीने काम करीत असल्याने शेतकरी संतापले आहेत. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असताना बाधीत शेतकरी आंदोलनस्थळी बसून होते. सायंकाळी सर्वांसोबत घरी निघताना श्री. राठी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, मागे आपण अभिनेते नाना पाटेकर यांचा ’अब तक 56’ चित्रपट पाहिला होता. त्याची आठवण आज झाली. कारण एवढेच की, अपप्रवृत्ती, गुंड प्रवृत्ती, भ्रष्टाचारी, मनमानी करणारे अशा सगळ्या प्रकारच्या 56 लोकांना एक-एक करुन कंठस्नान घालणार्‍या अर्थात एन्काउंटर करणार्‍या आणि व्यवस्थेच्या हातून छळले गेलेल्या एका जिगरबाज पोलीस अधिकार्‍याची व्यक्तीरेखा नाना पाटेकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचा उल्लेख करण्याचं औचित्य एवढंच की आज 56 दिवस उलटताना आमच्या आशा-अपेक्षांचे एन्काउंटर करण्याचे काम प्रशासनाच्या काही अधिकार्‍यांनी चालविले आहे, असे सांगून श्री. राठी पुढे म्हणाले की, सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा क्रांती घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग ते भगतसिंग असतील, राजगुरु किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असतील. ज्यांनी शासन-प्रशासनरुपी व्यवस्थेच्या मनमानीला, अन्याय-अत्याचाराला कंटाळून काही करायचं ठरवलं तर शासन-प्रशासनाला ते अडचणीचं ठरलेलं आपण पाहिलं. सर्वसामान्य माणसाने, सामान्य जनतेने उठाव केल्यास अनेक ठिकाणी तख्तापलट झालेला आहे.

विकासकामे करताना नितीबरोबरच नियतही शुध्द असावी-कोल्हे महाराज
समृद्धी महामार्ग बाधित शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आज 56 वा दिवस असून, ऊन, वारा, पाऊस असो की इतर अडचणी असो सर्व शेतकरी व्यक्तिगत काम धंदे बाजुला ठेवून आंदोलनस्थळी येतात. आपल्याला आशेचा किरण पहायला मिळेल, अशी भाबडी आशा अंतःकरणात ठेवून दररोज वाट पाहतात की शासन-प्रशासनातले कुणीतरी येईल आणि आम्हाला न्याय देईल. मात्र, दररोज अपेक्षाभंग होण्यापलीकडे काहीच पदरात पडत नाही, अशी खंत रामनगर (साखर कारखाना) येथील बाधीत शेतकरी हभप गणेश महाराज कोल्हे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, 2 महिन्यापुर्वी आमच्या काही माऊल्या केदारनाथाच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्यातल्या एका माऊलीची मुलगी सन 2013 साली केदारनाथ येथील पुरात वाहून गेली असल्याने ती माऊली यावेळी तिथे गेल्यानंतर आपली मुलगी दर्‍या-खोर्‍यामध्ये मिळून येईल, अशी तिला अपेक्षा होती. मुलगी हाक मारत असल्याचा भास तिला झाला. जसे एका आईला आपल्या पुरात वाहून गेलेल्या मुलीने हाक मारल्यास जी वेदना होते ती आई-बापाचं अंतःकरण असलेल्यालाच कळते. बाकी कोणाला या वेदना कळतील की नाही हे सांगता येत नाही. त्या आईला जसा मुलगी हाक मारीत असल्याचा भास झाला तसाच शुद्ध भाव बाधीत शेतकर्‍यांच्या बाबतीत मायबाप सरकारच्या अंतःकरणात असावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन कोल्हे महाराज पुढे म्हणाले की, सर्व बाधित शेतकरी कुठल्याही संकटाची तमा न बाळगता दररोज येथे येत असून, शासन-प्रशासनाकडून काहीतरी उत्तर मिळेल, असे वाटत असताना दुर्दैवाने तसे घडत नाही. अवस्थेला अनुसरुन व्यवस्था असली पाहिजे, असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. गीता, पखवाज, टाळ, वीणा, श्रोते, मंडप, लाईट, डेकोरेशन या सुविधा आमच्या कीर्तनासाठी लागतात. मात्र, किर्तन कशासाठी आहे याचे उत्तर शोधल्यास अवस्था प्राप्त होण्यासाठी असल्याचे स्पष्ट होते. तथापि, ज्या व्यवस्थेतून अवस्था प्राप्त होत नाही त्या व्यवस्थेलाच किंमत राहत नाही. ज्याप्रमाणे एखादा प्रकल्प राबविण्याची तुमची नीती असेल त्याचप्रमाणे नियतही असावी लागते. वेगवेगळे उद्योग आणायचे, वेगवेगळ्या पध्दतीचे रोड मॅप आणायचे असतील, काय करायचा तो विकास करा; पण आमच्या वडिलोपार्जित जमिनी घेताना तुमची नीती आणि नियत चांगली असली पाहिजे. मात्र, आम्हाला भिकारी करायची एकही संधी तुम्ही सोडत नाहीत. मी व्यक्तिशः वेळोवेळी बाधित झालेलो आहे. काही दिवसापुर्वी माझ्या शेतातून नंबर बांध रस्ता नेताना मोसंबीची 20 झाडे काढून फेकण्यात आली असून, माझी 8-10 फुट जमिन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे माझे प्रचंड नुकसान झाले असताना मावेजाच काय मला साधी विचारणा करण्यात आली नाही, याचे उत्तर कोण देणार. तत्पुर्वी विज वितरणाचे टावर टाकताना हुकूमशाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात कुठलाही मावेजा न देता टॉवर उभारण्यात आले. सन 1985 साली तुमच्या मुलाला नोकरीला लावू असे सांगून आमच्या आजोबांची दिशाभूल केली आणि आमच्या जमिनीतून पिरकल्याण प्रकल्पाचा कॅनॉल नेला. त्यात दीड एकर जमिन गेली असून, नोकरी तर दिलीच नाही. फक्त एकरी दीड हजार रुपये मावेजा दिला. त्यामुळे आमचा बाप नोकरीविना घरी राहिला आणि जमिनही गेली. अशा पध्दतीने वेळोवेळी माझ्यासारख्या अनेक शेतकर्‍यांवर अन्याय होत असून, ही चौथी वेळ आहे. प्रत्येक शेतकर्‍याचे हेच प्रश्न असून, यावेळी न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा कोल्हे महाराजांनी शेवटी दिला.

त्यामुळे आजही आम्ही आशावादी असलो तरी शासन-प्रशासनाकडून सारखी निराशा होतेय. मंगलप्रभात लोढा हे राज्याचे कॅबिनेट मंत्री हे आज जालन्यात होते. त्यांच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात उद्योगपतींसाठी, जैन समाजासाठी वेळ होता. विविध सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली. मात्र, त्याच ना. लोढा यांच्याकडे बाधीत शेतकर्‍यांसाठी वेळ नव्हता, त्यांच्यासोबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनाही वेळ द्यावा लागल्याने आमचा प्रश्न तसाच राहिला. खरे तर आ. खोतकरांनी आज बाधीत शेतकर्‍यांशी संबंधित बैठक लावली होती. त्यासाठी सर्व संबंधित अधिकार्‍यांना बोलावलेही होते. मात्र, कॅबिनेट मंत्री जालन्यात असल्यामुळे राजशिष्टाचाराचा भाग म्हणून खोतकरांना त्यांच्याबरोबर दिवसभर रहावे लागले. मंत्री येण्याचा आम्हाला फायदा तर झालाच नसून उलट खोतकर साहेबांना आमच्यासाठी बैठक घेता आली नाही आणि प्रश्न प्रलंबीत राहिला. कुठलाच मंत्री लक्ष द्यायला तयार नसल्याने आमच्याकडून खर्‍या अर्थाने काही चुक झाली आहे की काय, याबाबत आत्मचिंतन करावे लागेल, असे श्री. राठी यांनी स्पष्ट केले. 

LatestNews

‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन
शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम 
राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; औरंगाबाद, लातूर विभागात अनंत भालेराव पुरस्कार महेश जोशी यांना जाहीर
गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावागावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
मंत्रिमंडळ निर्णय; महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग